मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानचा योग्य आदर केला नाही आणि तेथील नेतृत्त्वाने जर अण्वस्त्रे भारताच्या दिशेने रोखली तर भारतासाठी मोठा धोका उद्भवू शकतो.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा टप्पा नुकताच पार पडला. या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. अनेक वादग्रस्त विधानांची निवडणूक आयोगाने दाखल घेतली. आता काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले असून त्यामुळे काँग्रेस पक्षाला नुकसान सहन करावे लागू शकते. मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानशी चर्चा व्हावी, त्यांचा आदर केला जावा कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. अय्यर यांनी म्हटले आहे की, जर पाकिस्तानचा योग्य आदर केला नाही आणि तेथील नेतृत्त्वाने जर अण्वस्त्रे भारताच्या दिशेने रोखली तर भारतासाठी मोठा धोका उद्भवू शकतो.
मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान हा सार्वभौम देश आहे आणि जगभरात त्याचा दबदबा आहे. त्या देशाचा आदर जपा. त्यांचाशी निदान चर्चा तरी कराच. पण तुम्ही (केंद्र सरकार) कठोर भूमिका घेतली आहे. त्याने काही उपाय मिळणार नाही, पण तणाव मात्र वाढेल. एखादा सनकी माणूस आला त्या देशाच्या शीर्षस्थानी आला तर भारताचे काय होईल? त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत.
मणीशंकर पुढे म्हणाले, हो आपल्याकडेही अण्वस्त्रे आहेत, पण एखाद्याने लाहोर स्टेशनवर अणुबॉम्ब फोडला तर त्याचे रेडीएशन अमृतसरपर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही. जर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलात तर या गोष्टी होणार नाहीत.आम्हाला विश्वगुरु बनायचे असेल तर सर्वात आधी आपल्या शेजारील राष्ट्रांशी आपले संबंध सुधारले पाहिजे. कितीही मोठी समस्या येवो, पाकिस्तानसोबत संवाद साधणे गरजेचे आहे. गेल्या १० वर्षांपासून हे सर्वच बंद आहे. पाकिस्तानबाबत काही चुकीचा समज करून घेऊ नये अन्यथा आपण गोत्यात येऊ असेही अय्यर यांनी मुलाखतीत म्हटले.